झुंड : परिवर्तनाची नांदी




झुंड चित्रपटातील एका फ्रेमची खूप चर्चा होत आहे. अमिताभ बच्चन हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करतानाची ती फ्रेम. कमाल ह्याची वाटते की, वास्तवात अशी फ्रेम मिरवणुकीत वगैरे मी तरी कधी पाहिली नाही. ना आंबेडकरांच्या जयंतीला ना शिवाजी महाराजांच्या जयंतीला. ह्याच वाईट वाटतं. महामानव कुठल्या तरी एकाच जातीचे असं जे चित्र निर्माण केलं आहे. ते पुसण्याचं काम ‘झुंड’ करतो. लोककलावंतांनी किंवा चित्रपटात आंबेडकरांवरील गायलेली गाणी मराठा किंवा सवर्ण समजल्या जाणाऱ्या समाजांमध्ये ऐकली जावीत. याउलट अनुसूचीत जाती जमातींमध्ये कमी मान्यता असलेल्या महामानवांची गाणी ऐकली जावीत. तेव्हा किमान परिवर्तनाला सुरुवात झाली असं म्हणता येईल.
आपण ज्या ठिकाणी राहतो, कुणाच्या संगतीत राहतो त्यानुसार आपल्यावर संस्कार घडत राहतात. त्यानुसार गुन्हेगारी सारखे अवगुण आपल्याला चिकटतात. संसाधने, संधी आणि ज्ञान ह्या तीन गोष्टी उपलब्ध झाल्या की तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही. वसाहतीतील फुटबॉल टीमचे कोच विजय सर (अमिताभ बच्चन) ह्यांनी टीमला तीन गोष्टीच मिळवून दिल्या नाही तर, त्यांनी सर्वांची कहानी ऐकली, त्यांच रडणं अनुभवलं, त्यांना समजून घेतलं आणि आपल्यातलं आणि वसाहतीतल्या फुटबॉल टीममधलं अंतर शुन्य केलं. कोर्टात आपल्या टीमची बाजू मांडताना कोच (अमिताभ बच्चन) म्हणतात, “ये बच्चे बुरे नही है, सिर्फ वह अच्छे और बुरे चिजो को समझ नही पाते”. चित्रपट जसा जसा शेवटाकडे येतो, तस तसा गुन्हेगारी आलेखाचा कर्व्ह उतरताना जाणवतो. विमानतळावरील सिक्युरीटी चेकच्या प्रसंगावरून हे लक्षात येतं. झुंड हा चित्रपट थिएटर्समध्ये जाऊन बघण्यासाठी मी १०० टक्के रेकमंड करत आहे. आवर्जून बघाच.
धन्यवाद दिग्दर्शक नागराज मंजुळे

Comments